शेतकर्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणार्या बँक व्यवस्थापकाविरूद्ध कारवाई करा - वंचित
जालना,दि. ३० -: येथील तालुक्यातील शेतकर्यांना पीक कर्ज देण्यास बँक व्यवस्थापक जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहे. शेतकर्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज बँकेसमोर निदर्शने करून व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
जालना तालुक्यातील काही शेतकर्यांना अद्यापही स्टेट बँक ऑफ इंडिया,अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, सेन्ट्रल बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया व इंडियन बँक या जालना भागातील बँकांनी अद्यापही पीक कर्जाचे वाटप केलेले नाही. या बँकाकडून जाणीवपूर्वक त्रुटी काढून शेतकर्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना खरीपसह रब्बी पिकांना वेळेवर खते व औषधी देण्यात यावी. तसेच बँक ऑफ इंडियाच्या जुना मोंढा बँक प्रशासनाने सिबेल चेक करुन महिंद्रा होम फायनान्सचे कारण दाखवून तुम्हांला पीक कर्ज देता येत नाही असे सांगून कर्ज देण्यास नकार दिला आहे. या उलट शासन व जिल्हाधिकारी यांनी सरसकट आदेश दिले आहे, शेतकर्यांना कर्ज वाटप करण्याचे, असे असतानाही बँक व्यवस्थापक व अधिकारी शेतकर्यांची पिळवणूक करीत आहे. यामुळे माळशेंद्रा, वंजारउम्रद यासह अनेक गावातील शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. या संदर्भात १६ जुलै रोजी लेखी निवेदन देऊन देखील अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नसल्याने आज बँकेसमोर निदर्शने करण्यात आले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके यांनी सांगीतले.
यावेळी वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने, आदीं पदाधिकाऱ्यांसह पीक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकर्यांनी निदर्शनात भाग घेतला.
Comments
Post a Comment